भाषा या संवादासाठी म्हणजेच विचारांच्या आदान-प्रदानासाठी असतात. म्हणून सर्व भाषांवर प्रेम करावं, कुठल्याही भाषेचा द्वेष करू नये अशी समन्वयाची भूमिका मराठी माणसाने नेहमीच घेतली आहे. परंतु हिंदी ही भाषा कानामागून येऊन मराठीलाच गिळंकृत करायला निघाली आहे, याची जाणीव महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या सरकारी निर्णयानंतर महाराष्ट्राला झाली. मराठीला अभिजात दर्जाचं गाजर दाखवत मागच्या दाराने हिंदीला राजरोस प्रवेश देण्याचाच हा प्रकार! या निर्णयाला जोरदार विरोध झाल्यानंतर हिंदीची सक्ती नसून तिसरी भाषा म्हणून कुठलीही भारतीय भाषा निवडता येईल मात्र त्यासाठी विद्यार्थीसंख्या कमीत कमी २० असावी असा अव्यवहार्य तोडगा काढला गेला. यावर कडी म्हणजे महाराष्ट्रात पहिलीपासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार ही बातमी. मराठी भाषा, संस्कृती, इतिहास या सर्वांनाच नेस्तनाबूत करण्याचा हा डाव स्पष्ट दिसत आहे. मराठी माणसाचा विरोध मोडून काढण्यासाठी साळसूदपणाचा आव आणत युक्तिवाद केले जात आहेत. ‘हिन्दी मराठी वाद नाही, मुद्दा आहे!’ या लेखातून डॉ. सुधीर देवरे यांनी हिंदी-समर्थकांना उत्तर दिलं आहे.

