वाङ्मयप्रकार हे देश-काल-भाषेच्या सीमा ओलांडणारे असतात. ‘दशपदी’ या काव्यप्रकाराच्या संदर्भात कवी अनिल यांचे नाव मराठी साहित्याच्या वाचकांना चटकन आठवते. बंगाली भाषेत कवी द्विजेंद्रलाल राय यांनीही ‘दशपदी’तून काव्याभिव्यक्ती केलेली आहे. काही वेळा असे दिसते, की अनुभवाचा विशिष्ट रीतीने अर्थ लावणारी मनुष्याची प्रतिभा एखाद्या ठरावीक संरचनेद्वारे प्रकट होते. या संदर्भात, कोणाला जाणीवपूर्वक काव्यनिर्मिती हा कवीचा गुण वाटतो तर कोणाला ‘सहेतुक जाणीव’ हा काव्यदोष! कवी अनिल आणि कवी द्विजेंद्रलाल यांच्या दशपदींची, त्यांचे आशय, काव्यप्रकृती, भूमिका, छंदरचनेतील प्रयोग इत्यादि विविध निकषांवर तुलना करून, डॉ. जयश्री पाटणकर यांनी ‘मराठी व बंगाली दशपदीचा तौलनिक अभ्यास’ या लेखात काही रंजक निरीक्षणे वाचकांसमोर ठेवली आहेत.

